Wednesday, April 13, 2016

पाणी आटलंय….

पाणी आटलंय….
नदीचं न्हवं… तिचं पाणी तर कवाच आटून गेलंय….
भल्या मोठ्या तिच्या पात्राला कोरडेपणाच ग्रहण लागलंय…
आता नुसतीच दगडं उरल्यात त्येस्नीबी पाझर फुटना झालाय…
अन दगडातला देव पण आमाला पावना झालाय….

पाणी आटलंय….
झऱ्याच न्हवं… त्येन तर वाहायचं कधीच सोडून दिलंय…
त्येचं मंजुळ गाणं… काळाच्या पोटात कवाच हरीवलंय…
जुन्या गोड पाण्याविना झऱ्याचा घसाबी आता पार कोरडा पडलाय…
भेगाळलेल्या धरणीच्या कुशीत त्यो आता कायमचा दडलाय…
पाणी आटलंय….
विहिरीचं न्हवं… तिच्या तळाला तर आता गाळ पण सापडणा झालाय…
जीव द्यायाला सुदा तिचा उपेग हुईना झालाय…
पोराबाळांच्या घशासारकी ती बी आता कायमची कोरडी पडलीया…
परत कदी पान्हा फुटल ही आशाच आता तिनं सोडून दिलिया…
पाणी आटलंय….
धरणाचं न्हवं… साठणार न्हाई पाणी असा जणू शापच त्येला दिलाय…
त्यात साठवलेला थेंब न थेंब कवाच वाफ बनून निघून गेलाय…
दुष्काळान विटलेल्या गावावाणी धरण बी ओस पडत चाललंय…
थेंबभर पाण्यासाठी धरणाच एक एक दार जणू आसुसलंय…
पाणी आटलंय डोळ्यातलं….
व्हय…. पाणी आटलंय आमच्या पोराबाळांच्या पापण्यातलं…
पाणी आटलंय आमच्या बायाबापड्यांच्या रिकाम्या घागरीतलं…

पाणी पाणी करून आता आमच्या रक्ताचं पाणी झालंय…
मारताना सुदा दोन घोट पाणी कुणाला मिळना झालंय…
पुढ्यात जीव सोडणाऱ्या जनावराला बघून काळजाचं पाणी पाणी हुतंय…
मेलेल्या माणसांची राख वाहायला तरी इथं कुठं पाणी सापडतंय…
रोजच्याच या मरणाचं दुख… कितीदा तरी गळ्यात दाटतंय…
अन असंच कवातरी मग आमच्याच डोळ्यातलं पाणी आटतंय….
नदी, झरा, विहीर, धरण…. आता सगळच पाणी आटलंय…
म्हणूनच काळजात उठणाऱ्या हुंदक्याला… आज पापणीच्या उंबर्यावरच गाठलंय…
कधीच न मिळणाऱ्या पाण्यासाठी आता वणवण करायची इच्छा न्हाई…
अन त्या बिचाऱ्या  परमेश्वराला बी दया  यील अशी आशा ऱ्हायली न्हाई…
तरीबी…
शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचं ठरीवलय…
आणि घोटभर पाण्यानंच आता ही तहान भागवायची असं ठरीवलंय…

- व्यथा एका दुष्काळग्रस्ताची 

पाणी आटलंय खरंय… पण आपल्यातली माणुसकी पण आटली आहे का? कुठल्यातरी गावात कुठेतरी दुष्काळ पडलाय मग मी का पाणी वाचवायचं असं म्हणण्याइतपत आपली नैतिकताही आटली आहे का?
दुष्काळाच्या बातम्या वाचून हळहळणारे आम्ही पण साध एक वेळ नळ चालू न ठेवता ब्रश सुद्धा करत नाही… उन्हाळा आहे म्हणून आम्हाला कमीत कमी दोनदा तरी अंघोळ लागते… काल परवाच शिळं पाणी प्यायचं आमच्या जीवावर येतं… आणि कहर म्हणजे ते पाणी इतर कामासाठी न वापरता आम्ही ओतूनही देतो… आमचे कपडेही एकदा घातल्यावर धुतल्याशिवाय आम्ही परत हात लावत नाही… आणि भांडीसुद्धा नळाखाली खळखळून धुतल्याशिवाय स्वच्छ वाटत नाहीत… 

पण निदान आता तरी विचार करायला हवा…
आज पाणी आहे म्हणून तुम्ही सधन आहात… पण हा साठा संपायला वेळ लागणार नाहीये… नंतरची भयानक परिस्थिती टाळता येणार नाही कदाचित पण थोडी लांबवता तरी येईल… जे आपले जीवाभावाचे शेतकरी आज पाणी संकटात आहेत… दुष्काळाचं रूप घेऊन आलेल्या मृत्यूच्या विळख्यात अडकले आहेत… त्यांच्यासाठी निदान थोडं तरी पाणी वाचवूया… 
म्हणून म्हणते… 
तुम्ही जर हंडाभर वाचवलंत तर त्यांच्यापर्यंत घागरभर तरी पोहचेल… 
घागरभर वाचवलंत तर एखाद्याला कळशीभर तरी मिळेल…. 
कळशीभर वाचवलंत तर एखाद्या कोरड्या घशाला तांब्याभर तरी शांत करेल… 
तांब्याभर वाचवलंत तर निदान वाटीभर तरी कुठेतरी पोचेल… 
वाटीभर वाचवलंत तर निदान थेंबभर कुठंतरी त्यांच्यासाठी साचेल…. 
आणि वाहणारं थेंबभर पाणी जरी वाचवलंत तर त्यांच्या डोळ्यांतला एखादा थेंब तरी नक्कीच वाचेल…. 

चला… जमेल तितकं वाचवूया… जमेल तसं वाचवूया…. या पाण्यापायी जाणारा निदान एकतरी जीव वाचवूया…. 

Please Save Water…
- टिंग्याची आई

Sunday, April 10, 2016

भिशी….

भिशी म्हटलं कि आठवते लहानपणी मोठ्या हौसेनं आणि काटकसरीने भरलेली ती मातीची भिशी… :)
रोज नाही पण आठवड्यातून एकदा ते पण शनिवारी खाऊसाठी मिळालेल्या पैशातून वाचवलेले चार आणे आठ आणे आम्ही भावंडं न चुकता त्या भिशीत टाकायचो… कधी कधी तर खाऊ न घेता मन मारून अख्खा रुपया सरळ त्यात जायचा… त्या भिशीला हवं तेव्हा पैसे काढण्याला जागा न्हवती… संपूर्ण भरल्यावरच फोडण्यात खरी मजा यायची…. :)
दरवेळी आत जाणाऱ्या नाण्यासोबत छोटासा आनंद मिळायचा… आणि भिशी फुटताना होणारा एवढा मोठ्ठा आनंद ह्याच तर छोट्या छोट्या आनंदाने बनलेला असायचा…

आम्ही तीन भावंडं… ताई मी अन छोटा भाऊ… तिघेही साठवायचो त्यात पैसे… ताई थोडी मोठी आणि समंजस त्यामुळे तिचाच मोठा वाटा असायचा ती भिशी भरण्यात…. मी आपली खाऊच्या पैशातून जमेल तसे टाकायची… आणि आमचे धाकले बंधुराज म्हणजे महा हुश्शार… खाऊसोबत खास भिशीत टाकायला म्हणून आणखीन एक रुपया मागून घ्यायचा… पण तो तरी किती वेळा त्या भिशीत गेला होता देव जाणे… :)

दरवेळी रुपया टाकला कि वाजवून पहायचं किती भरलंय आणि कॅलेंडर वरची वाढदिवसाची तारीख बघायची… ज्याचा कुणाचा बडे असेल त्याच्यासाठी ती भिशी फुटायची… आम्ही पैसे कितीही कमी टाकले तरी बरोबर वाढदिवसाआधी ती भिशी भरायची…. 
आई बाबा आमच्या नकळत कधी त्यात पैसे टाकत माहित नाही… पण आम्ही मात्र स्वतः साठवलेल्या पैशातून वाढदिवसाचं गिफ्ट मिळवल्याच्या आविर्भावात जग जिंकल्याचा आनंद साजरा करत हिंडायचो… :)

आई सांगायची नेहमी… हि भिशी आपल्याला धीर धरायला शिकवते… आयुष्यात चांगल्या क्षणांना असंच साठवून ठेवायला शिकवते… सुख दुःखाच्या वेळी एकतरी चांगली आठवण अशी सांभाळून ठेवायची असते आणि आयुष्यात भेटणाऱ्या आपल्या माणसांना असंच जपून ठेवायचं असतं हेच ती भिशी सांगत असते… 

आमच्या सारखीच आईचीही एक भिशी होती… ती म्हणजे भांड्याच्या कपाटातला एक छोटासा डब्बा… तो डबा कधी तांदळाच्या पोत्यात लपलेला असायचा तर कधी गव्हाच्या गोणीमध्ये… पैसे लपवायचे म्हणून हे सगळ न्हवतं… तर कोणत्याही खर्चासाठी तिकडे लवकर हात जाऊ नये म्हणून… घर खर्चासाठीच्या पैशातून सगळे खर्च भागवून उरल्या सुरल्या पैशातच तिच्या भिशीचा हप्ता असायचा… मग कधी २० रुपये मिळायचे तर कधी ५ रुपयावारच समाधान मानावं लागायचं…
जितक्या हळू हळू ती भिशी भरायची त्याहून कितीतरी लवकर ती रिकामी व्हायची… कधी आमची आजारपण तर कधी शाळेची फी… कधी अचानक आलेले पाहुणेरावळे तर कधी आमची भिशी भरायला… :)

आईची हि भिशी आम्ही रिकामी होतानाच जास्त पहिली होती… पण ती मात्र नव्या उमेदीने पुन्हा सुरुवात करत असे… तेव्हा तिच्याकडे बघून वाटायचं कदाचित आईच या भिशीला संयमाचे धडे देत आहे… धीर कसा धरायचा हे जणू आईच त्या भिशीला शिकवत असायची… :)
असो… आमची आणि आईची या दोन्ही भिशीत जमीन अस्मानाचा फरक होता… :)
इतके दिवस बाप्पाच्या देव्हार्याजवळ जपून ठेवलेली ती भिशी पडेल फुटेल म्हणून फार काळजी वाटायची… रोज बाप्पाला साकडं घालायचं लवकर भरू दे रे बाप्पा आणि हो सांभाळून ठेव  भरेपर्यंत… 
पण गच्च भरल्यावर तीच भिशी फोडताना कसलीच काळजी वाटायची नाही… इतक्या दिवसांच्या मेहनतीचे फळ जे मिळणार असतं ना… 

इतके दिवस साठवलेला एक एक पैसा मोठी रक्कम बनून हातात पडायचा… बचतीचं महत्त्व तेव्हाच कधीतरी डोक्यात घट्ट बसलं होत ते आजवरही तितकच फिट आहे… :)

मोठ झालो तशा बऱ्याच भिशा भरल्या फुटल्या आणि मग कॉलेज मध्ये गेल्यावर भिशीची जागा बांसोबतच्या joint account ने घेतली कळलंच नाही… नंतर पुढे जाऊन नोकरीला लागलो आणि स्वतःच असं सेपरेट सेविंग acct काढलं… आता दर महिन्याला भला मोठा पगार जमा होतो तिथे आणि हो महिना अखेरीस रिकामं सुद्धा होत… :)

इतकं कमवायला लागलोय तरीही मुलाच्या भिशीमध्ये रोज न चुकता एक रुपया टाकतोय… आजही ती सवय काही गेली नाहीये… त्याची भिशी तशी भरता भरता बऱ्याचदा रिकामी सुद्धा होते म्हणा… कारण तिला तशी सोय आहे… हवे तेव्हा पैसे काढण्याची… प्लास्टिकची ही पिग्गीबँक पडली तरी फुटायचं टेन्शन नसतंच… 
आजकाल आपली नातीही अशीच काहीशी वाटतात… चांगले क्षण आजही साठवतो आपण पण खरतर ते हवे तेव्हा हवे तसे वापरतो… ते एक्स्ट्राचं झाकण काढून… गरजेनुसार… :)

असो… समाधान इतकंच कि लेकाला सुद्धा हि पिग्गीबँक ची सवय लागली आहे… अधून मधून आठवण येईल तसे तो पैसे साठवतो…. नाणी नोटा अगदी मिळेल तसे आणि मिळेल तेव्हा आठवणीने त्यात टाकतो… आणि दर बडे ला त्यातल्याच पैशातून त्याचं गिफ्ट आणलं जातं… साठलेल्या शे पाचशे रुपयात सुद्धा त्याची महागडी गिफ्ट्स येतात यातच त्याला भला मोठा आनंद मिळतो… :)

अशाच साठवलेल्या आंबट-गोड क्षणांची शिदोरी जशी आजवर मला पुरली आहे तशीच त्यालाही ती मिळत राहील अशी आशा आहे… :)
तोवर सेव करत राहायचं… Happy Saving…. 

- टिंग्याची आई