Thursday, December 29, 2016

अभंग अपेक्षा....

आमचे हे नेहमी म्हणतात .... "माणसाने कधीही कुठली अपेक्षा ठेवू नये... अगदी कुणाकडूनही नाही...."
माझ्यापेक्षा चार-पाच पावसाळे जास्त पाहिलेत त्यांनी आणि आजवरच्या अनुभवावरून त्यांनी हा नियम बनवून घेतलाय आणि स्वतःवर लागू सुद्धा केलाय... :)

पण माझं थोडं वेगळं आहे... मला वाटतं माणसाने अपेक्षा ठेवलीच नाही तर जगणं थोडंसं मुश्किल होईल.... 
समोरून येणारा ओळखीचा माणूस आपल्याकडे बघून स्माईल करेल एवढी माफक अपेक्षा तर असतेच ना... अन ती नाही ठेवली तर आपल्यातरी तोंडावर हसू कसं येणार नाही का... ????

सकाळी डोळे उघडल्यावर समोर आई दिसेल अशी अपेक्षा असते म्हणूनच तर पिल्लू हसत हसत डोळे उघडतं... 
आपल्याला येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बाई आपल्यालाच विचारणार अशी अपेक्षा असते म्हणून आपण आधीच हात वर करून तयार असतो.... 
खेळात आपण जिंकणार अशी अपेक्षा असते म्हणून तर आपण डबल जोर लोळवून खेळतो... 
आजचा दिवस चांगला जाईल हि अपेक्षा असते म्हणून तर आपण आनंदाने दिवसाची सुरुवात करतो.... 
शिखरावर नाही निदान मध्यावर तर पोहचू अशी अपेक्षा ठेवूनच प्रत्येकजण चढाईला सुरुवात करतो.... 
कुणी ओळखीचं वळणावर भेटेल याच अपेक्षेने आपण प्रत्येक वळण मागे टाकतो... 
कुणीतरी डोळे पुसणारं आपलं माणूस सापडेल म्हणूनच तर आपण आसवं ढाळतो... :)
आणि हो... दुःखाच्या गर्दीतून कधीतरी सुखही समोर येईल याच अपेक्षेवरच तर आपण आयुष्य जगत असतो... :)

छोट्या मोठ्या... बऱ्याच अपेक्षा... कधी क्षुल्लक... कधी खूपच गंभीर... महत्वाच्या... 
अपेक्षा हि अपेक्षा असते... कधी आपलीच इच्छा असते तर कधी एक आशा... 

अपेक्षा नेहमीच ठेवावी माणसाने पण ती पूर्ण झालीच पाहिजे अशी अपेक्षा मात्र ठेऊ नये...  :)
अपेक्षेचा भंग झाला कि मग सगळंच बिनसतं... म्हणून मला वाटतं.... नेहमी तुमची अपेक्षा अभंग ठेवा... अपेक्षा भंग नसेल तर होणारा त्रासही नसेल... मनाची नाराजी पण नसेल... पण एक नवी आशा मात्र दरवेळी असेल आणि तीच तुम्हाला प्रफुल्लित ठेवेल... 

एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली तर या वेळी नाही... पुढच्यावेळी सही म्हणून तीच अपेक्षा नव्याने ठेवा... हीच ती अभंग अपेक्षा... अभंग मुद्दामच सुरुवातीला ठेवला तो भंग होणार नाही मग अपेक्षा भंग होण्याचा प्रश्नच नाही... :)

मान्य आहे हे सर्व सांगणं लिहिणं जितकं सोप्प आहे तितकंच ते अमलात आणायला खूप अवघड आहे... पण काय आहे ना... ये दिल बडा बेवकूफ आहे... इसपे हाथ राख के कहो... ऑल इज वेल... बेचारा मान भी जाता है... :)

म्हणूनच अभंग अपेक्षा ठेवा.. पूर्ण झाली तरी आणि नाही झाली तरी तुमच्या वाट्याचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल... :)

आणि हो...माझी कोणतीही पोस्ट वाचणाऱ्या दहा जणांपैकी एकाला तरी मी मांडलेला विचार आवडेल आणि काहीतरी कंमेंट मिळेल... याच अपेक्षेपोटी मी प्रत्येक पोस्ट टाकते... आणि समजा नाहीच आवडलं कुणाला तर तीच अपेक्षा ठेवून मी पुढची पोस्ट टाकते... :)
तर मग एका नव्या अपेक्षेने एका नव्या वर्षाची सुरुवात करा मीही करतेय... 
Happy New Year २०१७ :) 

- टिंग्याची आई 

No comments:

Post a Comment