Friday, February 7, 2014

पत्र…

हरवलेल्या पत्राला लिहिलेलं पत्र  :)
।। श्री ।।
प्रिय पत्र… 
सा. न. वि. वि.

पत्रास कारण की… फार दिवस झाले… सॉरी सॉरी… फार वर्षं झाली तू आमच्याकडे आला नाहीस… रागावलास का रे आमच्यावर…? इतक्या सहज तुला विसरून गेलो म्हणून…? अरे हल्ली या फोन, ईमेल, इंटरनेट, फेसबुक च्या नादात तू कुठे आणि कसा हरवून गेलास कळलच नाही… त्या छोट्याशा ४x६ च्या तुझ्या देहावर तू सगळ्यांची ख्याली-खुशाली घेऊन यायचास… कधी मावशी येत असल्याची वर्दी तर कधी कोणी १०वी पास झाल्याची खुशखबरी… कधी कोणाच्या लग्नाचं निमंत्रण तर कधी कोणाच्या बारशाचं आमंत्रण… कसलीही खबर असो आम्ही मुलं कौतुकानं तुझी वाट पहायचो… पोस्टमन काका कॉलनीत शिरताच आम्ही त्यांच्या सायकलच्या मागे पळायचो… "आमचं पत्र आलंय का हो काका?" उगीचंच त्यांना विचारायचो… पण तू नेमका तिसऱ्याच कोणासाठीतरी आलेला असायचास… आणि आमच्यावर खुदु खुदू हसत ज्याच्याकडे आलेला असायचास त्याच्या घरी गायब व्हायचास… 
वर्षातून ३-४ वेळाच तू घरी यायचास पण खूप भारी वाटायचं… कधी आजीच्या घरून तर कधी आत्याच्या घरून… कसलं भारी वाटायचं तुला वाचून… 
माथ्यावर ।।श्री।। शिवगंधासारखा रेखलेला… सा. न. वि. वि. मग पुढे प्रिय टिंब टिंब… तुम्ही कसे आहात मग आम्ही बरे आहोत करत करत अलीकडच्या पलीकडच्या चार घरांची विचारपूस आणि खुशाली कळवली जायची… पुढच्या सुट्टीत नक्की या किंवा येऊ असं काहीतरी लिहून शेवटी 'कळावे' ठरलेले… :) पत्ता लिहायला तर २-३ ओळीत चाळीपासून ते पार राज्य-महाराष्ट्र पर्यंतचा सगळा पत्ता कसातरी मावायचा… पण खर तर तेव्हा फक्त नावचं पुरेसं असायचं पत्र योग्य पत्त्यावर पोचायला… :) हल्ली नाही तसं चालत… अगदी खोलीनंबर पर्यंत सगळं अप टू डेट द्यावं लागतं… 
असो… तर तू घरी आल्यानंतर…  तुला घरातला प्रत्येकजण वाचायचा… पहिला मान बाबांचा… डोळ्यावरच्या चष्म्याने पत्र एका दमात वाचून काढावं आणि तेव्हाच ते त्यांना तोंडपाठ व्हावं परत वाचायची गरजचं नाही… :) मग आम्हा मुलांचा नंबर… शाळेतलं काही वाचायला येत असो वा नसो पण पत्र वाचायला नेहमी पुढे… जमेल तितक्या मोठ्या आणि स्पष्ट आवाजात आईला पत्र वाचून दाखवायचं तेव्हाही जितकी भावंडं असतील त्यातल्या प्रत्येकाने निदान एकदातरी पत्र वाचलंच पाहिजे असा नियम… सोबत आपलही नाव कुठे लिहिलंय का हे पहायची वेडी धडपड… वर चिडवायला चान्स मिळायचा तो वेगळाच… :) 
आम्हा मुलांची हौस पूर्ण झाल्यानंतर कि आईने तुला स्वताच्या हातात घ्यावं… चुलीशेजारी बसून पुन्हा एकदा तुला भरल्या डोळ्यांनी मनातल्या मनात वाचावं… पदराच्या काठाने ओल्या झालेल्या पापण्यांच्या कडा पुसत तुला खिळ्याला अडकवलेल्या तारकीट मध्ये खोचून द्यावं… मग बाकी कागदांच्या सोबत तुही तिथंच बसून पुढच्या पत्राची वाट बघत आम्हा चिमण्यासारखं त्याच्या वाटेला डोळे लावून बसावं… 
आणि हो जेव्हा पत्र लिहायची वेळ येई तेव्हा… फार फार मज्जा असायची… शेजारच्या आजींनी ही पत्र लिहायची कामगिरी आमच्यावर सोपवावी आणि आमची सगळी शक्ती पणाला लावून त्याचं पत्र लिहाव… तयारी तरी काय वर्णावी… माथ्यावर नेहमीसारखा श्री उजव्या कोपऱ्यात तारीख अन सरळ रेषेत सगळ्या ओळी याव्यात म्हणून सुईने आखलेल्या अदृश्य रेषा… एवढं सगळं करूनही शेवटच्या ओळीपर्यंत अगदी व्यवस्थित सुरुवात झालेल्या ओळीसुद्धा फुग्याच्या तोंडाजवळ गोळा झाल्यासारख्या गोळा व्हायच्या… 
मागच्या बाजूलाही छोट्याशा जागेत लिहिताना इवली इवली वाक्यं जागा मिळेल तिथे घुसवायची…. अगदी पत्त्याच्या वर खालीही कुणाला तरी आशीर्वाद नाहीतर गोड गोड पापा देणारी ओळ लुडबुडत असायचीच… झालं… आजींच पत्र पोस्टाच्या पेटीत पडायला तयार… 
पुढे मोठे झाल्यावर व्यवस्थित अक्षरात आणि आकारात मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, प्रियजन सगळ्यांना लिहिलेली पत्र… होस्टेलवरच्या खोलीत डोळ्यात पाणी भरून आईला लिहिलेली आणि तिची आलेली पत्र… सगळी आजही आठवतात अगदी जशीच्या तशी… 
पण हल्ली नाही येत ती मजा… लोक जणू विसरूनच गेलेत तुला… फार फार तर सरकारी दफ्तरात सापडतोस तू हल्ली… फोन, मेल, chat, फेसबुक, watsup यावर गप्पा होतात रे… पण एवढ्याशा पत्रात सगळं लिहून पाठवण्यात आणि ते वाचण्यात खरी मजा होती… आजकालच्या ईमेल आणि मेसेजेस ना तुझी सर नाही यायची… आम्ही खरंच तुला मिस करतोय रे… 
बाकी सर्व काही ठीक… आम्ही मुलं आता मोठी झालोय… आमचीही पिल्लं आली आहेत… आमच्यासारखीच खट्याळ :) आई-बाबा सगळे मजेत… 
तुझी खुशाली कळवायला तू स्वतः येणे… 
आंतरदेशीय काकांना आमचा साष्टांग नमस्कार सांगणे… 

कळावे…. 

तुझी लाडकी,
मोठी झालेली लहान मुलं
येशील ना रे पुन्हा आमच्याकडे? नक्की ये… आम्ही मोठेसुद्धा तुझी वाट पाहतोय पिल्लांसोबत… :)
- टिंग्याची आई

4 comments:

  1. Never been into the era of letters... always felt letters are more of insecure way of messaging with no any way of tracking.. may be newgen messanger effect.. why would kids like to learn how a failed system can be? May be a way to teach how not to be...

    ReplyDelete
  2. :) Dear... you may have missed something imp.. may be newgen messanger effect.. asu det... amhala avdaycha patra lihina and vachna vagaire.. ani amchya pillana mahiti asav hi ichha ahe.. :)
    tarihi gairsoy vhaychi he nakki.. ;)

    ReplyDelete
  3. Dear anonymous friend...you are right there are lags in postage system. writing a letter itself is a art...arranging words with beautifull own handwriting...not possible with messanger...messanger can not give you company to celibrate in happy messages and as well to keep hand on shoulder in sorrow news...which our freindly postman does...at last i can only say..new gen messanger connected...everyone...but no attachment in between which was there in era off letter..postcards...and postman....
    Ohh...one more thing....new gen messanger simply can't give you the joy of stamp collection...
    ($hivraj)

    ReplyDelete
    Replies
    1. finally you got time to read.. :)
      and thanks for this very nice comment.... its true... :)
      Thanks $hiva.. :)

      Delete