जेवता जेवता आज अचानक…
त्याला जोरात ठसका लागला…
पाण्याचा घोट घेइतोवर…
जीव कावरा बावरा झाला…
कुणीतरी आठवण काढली असेल…
एकजण सहज म्हणून गेला…
अन त्याची टिंगल उडवायला…
मित्रांना तो ठसका पुरेसा झाला…
डोळ्यातलं पाणी लपवत…
त्याने सहज सगळं सोडून दिलं…
खोलवर दुखलेलं काहीतरी…
मुद्दाम हसण्यावारी नेलं…
'त्या' शेवटच्या भेटीला…
आजच वर्ष झालं होतं…
तिनेच आठवण काढली असणार…
त्याला पक्कं माहिती होतं…
त्याला ठसका लागताच…
ती उगीच चिऊ-काऊ दाखवायची…
अन तो पाणी घेईपर्यंत…
तीच कासावीस व्हायची…
तिचं हसणं, तिचं बोलणं…
त्याच्या आजही लक्षात होतं…
तीही काही विसरली नसणार…
त्याला मनापासून वाटत होतं…
बरीचशी कारणं होती…
तो शेवटचा निर्णय घ्यायला…
पण मन अजून तयार न्हवतं…
तिच्याशिवाय आयुष्य जगायला…
त्या भेटीचा प्रत्येक क्षण…
त्याला जसाच्या तसा आठवत होता…
आयुष्यातला तो एक दिवस…
खोडून टाकावासा वाटत होता…
घासागणिक एक एक आठवण…
त्याने मनात नसताना गिळून टाकली…
मिणमिणती तिची छबी…
फुंकर मारून विझवून टाकली…
आठवण तर रोजच असते…
पण ठसक्याने सगळं ढवळून काढलं…
कळलंच नाही दोघातलं अंतर…
नक्की कमी झालं कि वाढलं…
न जाणो कोणत्या बंधनापायी…
दोघे एकमेकांशिवाय जगतात…
अन असा एखादा ठसका लागताच…
आठवणींचे ढग दोघांच्याही डोळ्यांत दाटतात…
- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment