Thursday, July 18, 2013

वारी...

आषाढी एकादशीच्या निमित्ताने… 
बोला पुंडरीक वरदे… हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… 
कशी थाटात निघाली… ही पंढरीची वारी…
विठू नामाच्या गजरात… न्हाली धरित्री सारी… 
कुठे वाजे मृदुंग… कुठे मंजुळ ती टाळ… 
माउलीच्या दर्शनास… व्याकुळल हे तान्ह भक्त बाळ… 

इथे भेटणाऱ्या प्रत्येकाला… सहज म्हणावं माउली… 
उन्हा पावसात साथ देई… विठूच्या भक्तीची साउली… 
इथे कुणा भेटे ज्ञानेश्वर… कुणा तुका,कुणा नामा… 
भला संत असो कि राकुस… इथे सर्वा मिळे फक्त क्षमा… 

दिसभर दमल्या भक्ताचे… देई पाय तो चेपून… 
साऱ्या भक्तांना आणतो… चंद्रभागेच्या तीरी जपून… 
कुणी चिंतेने ग्रासला… कुणा माथी कर्ज आहे… 
सर्वा सोबत असूनी एकटे… मन दर्शनाची वाट पाहे… 

डोळ्यातली सारी आसवं… जातील का बर पुसून…?
परतेल का वारीतला जीव… क्षणभर समाधानाने हसून…?
विठ्ठलमय होईल कसा… वारीतला क्षण क्षण…
चिंता आपसूक विरेल… जेव्हा वाहू त्याच्यापायी कण कण… 

तुझ्या वारीला या आलो… भाग्य लाभले आम्हास… 
तुझ्या दर्शनाने मिळेल… मनशांती या पतित देहास… 
तोच एक क्षण तुझा माझा… त्यात आयुष्य मज जगू दे… 
माऊली तुझी सावळी मूर्ती… मला डोळाभरून पाहू दे… 

-टिंग्याची आई

No comments:

Post a Comment